सहकार महर्षी जिजाबा अण्णा यांचे कार्य समाजाला आदर्श व प्रेरणादायी.
सहकार महर्षी जिजाबा अण्णा यांचे कार्य समाजाला आदर्श निर्माण करणारे व प्रेरणादायी आहे --प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील.
लिंब ता. 26 -सहकार महर्षी जिजाबा अण्णांचे कार्य समाजाला आदर्श निर्माण करणारे व प्रेरणादायी आहे, असे मत शिव व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी मांडले. ते गोवे येथील सहकार महर्षी जिजाबा अण्णा जाधव स्मृतिदिनानिमित्त शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक आयुष्य ,वैयक्तिक मत या सगळ्यांना बाजूला सारून समाजहित व राष्ट्रहित यासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करणारी मांदियाळी या मातीत जन्माला आली. या मातीच्या परंपरेचे पाईक म्हणून जिजाबा अण्णांचा उल्लेख करावा लागेल. माणसाच्या यशाची व्याख्या तरी काय आहे? आपण किती उंचीवर पोहोचलो? यावर आपलं यश ठरत नाही ,तर आपण किती जणांना त्या उंचीवर घेऊन आलो यावर आपले यश ठरते .सहकार महर्षी जिजाबा अण्णा यांची शाळा उभारणीतील काम, त्यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, उभे केलेले समाजकारण व राजकीय पातळीवर केलेले काम आज साक्षी ठरत आहे हा आदर्श आपल्यापुढे आहे आपण त्यांचे वारसदार आहोत हा अभिमानाचा विषय आहे. आज आम्ही जे आहोत ते त्यांच्या कार्यकर्तृत्वावर उभे आहोत. ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. इतिहास अशा माणसांच्या हातून घडतो. शेतीतील बदल आपण अंगीकारले पाहिजे आज रासायनिक खतांमुळे शेतीचे तात्पुरते उत्पन्न वाढले आहे. परंतु शेतीचा कायमस्वरूपी कस राहण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. पूर्वी शेतीच्या बाजूला झाडांच्या भिंती उभ्या होत्या या भिंती शेतीतील आर्द्रता शोषून घेतात व जमिनीत ओलावा टिकून ठेवतात. आम्ही जमीन वाढवण्यासाठी झाडे तोडून टाकली. यामुळे आपल्याला पुन्हा या झाडांच्या भिंती उभाराव्या लागतील, तरच जमिनीचे आरोग्य उत्तम राहून उत्पन्न भरपूर मिळेल. शेतीमध्ये पिकांचा फेरबदल केला पाहिजे .तेच तेच पीक घेतल्यामुळे शेतीचे आरोग्य बिघडते परिणामी उत्पन्न घटते तसेच एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी मिश्र पिके घेतली तर एका पिकाचा भाव घसरला तर तो दुसर्यातून भरून निघेल .शेतीमध्ये संकटे खूप येत आहेत संकटांना पर्याय शोधल्याशिवाय आपल्यातील क्षमता, गुणवत्ता बाहेर येत नाही. सध्याचे जग स्टॉलचे नसून मॉलचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचा मॉल करता आला पाहिजे. शिवाजी महाराजांनी येणाऱ्या संकटाला पुढे न झुकता त्यांच्याशी कशी झुंज द्यायची त्यानुसार नियोजन केले म्हणून तर स्वराज्याच्या सीमा वाढल्या. यावेळी मा. आमदार महेशजी शिंदे यांचे भाषण झाले .यामध्ये त्यांनी मुलांमधील संशोधक वृत्ती वाढवणे गरजेचे आहे ,असे त्यांनी सांगितले मी स्वतः कॉलेजला असताना एक संशोधन केले होते . शेतीमध्ये खूप संशोधन केले .कॉलेजमध्ये असताना उसापासून इथेनॉल बनवले इथेनॉल वर इंजिन चालवायला मला एक वर्ष लागले. इथेनॉल वरच चालणारे पहिले इंजिन कराड तालुक्यामध्ये झालेले होते त्यावरून मी इथेनॉलचा कारखाना उभारला अशा पद्धतीने भारतातील इथेनॉलचा पहिला कारखाना मी संशोधनवृत्तीने तयार केला .इथेनॉलवर इंजिन चालल्यामुळे 19 हजार कोटी रुपये या देशाचे वाचले. परकीय चलन वाचले .उसाचा दर १५०० वरून ३०००वर गेला आहे .त्याला इथेनॉल कारणीभूत आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. मदन दादा भोसले, उपविभागीय कृषि अधिकारी गुरुदत्त काळे यांची भाषणे झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. मदन दादा भोसले यांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन सागर जाधव व विजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार महेश शिंदे यांचा सत्कार हरिदास शिंदे व सुरेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचा सत्कार वैभव जायकर व निखिल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला तसेच उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांचा सत्कार सचिन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच गोवे येथील सेंद्रिय शेती व गोपालक सचिन गोरे व मालगाव येथील कृषिभूषण पुरस्कार विजेते विक्रम कदम यांचाही गौरव करण्यात आला तसेच जिजाबा अण्णा स्मृतीदिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. लिंब येथील लेखक अनिल सावंत यांच्या पारावरचा अड्डा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला किसनवीर कारखान्याचे संचालक हणमंतराव चवरे, माजी उपसभापती जितेंद्र सावंत, अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत ,अनिरुद्ध गाढवे पशुवैद्यकीय अधिकारी वाघ साहेब, किसनवीरचे माजी संचालक इंगवले बापू ,मानसिंग शिंगटे ,शंकर इंदलकर जयवंत पवार व गोवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम मंदिरातील वारकरी बालसंस्कार अध्यात्मिक शिबिरातील विद्यार्थ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहकार महर्षी जिजाबा अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत श्री कोटेश्वर प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदा भाऊ जाधव यांनी केले प्रास्ताविक सहकार महर्षी जिजाबा अण्णा जाधव स्मारक समितीचे सचिव भुजंगराव जाधव यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जगताप सर व सुरज घाडगे यांनी केले तर आभार तुकाराम जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोटेश्वर विद्यालयाचे व कळंबे हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध सहकारी संस्थांचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment