आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे
निसर्गातील बदलामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे____ प्रो. डॉ. राजेखान शिकलगार.
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने मृदा व पाणी परीक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या सत्र दोनचे साधन व्यक्ती प्रो. डॉ. राजेखान शिकलगार राजाराम महाविद्यालय कोल्हापूर हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस हवामानात अभूतपूर्व बदल होताना दिसत आहेत. पर्जन्याची अनिश्चितता त्यामुळे शेतकऱ्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिलेली आहेत. शाश्वत शेतीची संकल्पना राबवत असताना मृदा व पाणी परीक्षणासाठी जीआयएस सारखे तंत्रज्ञान वापरले तर शेती समस्येवर अचूक उपाय मिळतील. तसेच एखाद्या भूभागावरील विस्तृत स्वरूपात पाण्याची स्थिती काय आहे त्याचा सरासरी टीडीएस किती आहे पीएच किती आहे याची सर्वसाधारण माहिती जीआयएस तंत्रज्ञानातून मिळू शकते. त्या माहितीच्या आधारे विविध नकाशे तयार होतात व त्यामुळे सर्वसाधारण परिस्थितीचे आकलन होणे सुलभ होते. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे. कारण निसर्गातील बदल व त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, जी आय एस सारखे तंत्रज्ञान खूपच उपयुक्त आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी याचा वापर म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या निराकरण करणे होय. भूमिगत पाण्याचे साठे व ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे या तंत्रज्ञानामुळे समजते.
या कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. साधन व्यक्तीचा परिचय प्रा. सुरेश काकडे यांनी केला. आभार आग्रणी विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment