"साने गुरुजी हे भारताला लाभलेले संवेदनशील साहित्यिक होते" प्रा.दादाराम साळुंखे.
"साने गुरुजी हे भारताला लाभलेले संवेदनशील साहित्यिक होते"
प्रा.दादाराम साळुंखे.
कराड:- सैदापूर विद्यानगर येथील समाजभुषण बाबुराव गोखले ग्रंथालयात साने गुरुजी यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा.दादाराम साळुंखे म्हणाले,"मानवता हाच खरा धर्म आहे असे सांगणारे सानेगुरुजी एक उत्कृष्ट साहित्यिक होते.त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले.'मानवजातीची कथा' हे त्यांनी भाषांतरित केलेले पुस्तक साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणारे आहे. त्यांच्या साहित्यामध्ये समाजसुधारणा,मानवतावाद, देशभक्ती, संस्कार भरभरून आले आहेत. भारताला विविध क्षेत्रात बलशाली करुन विश्वात तो सर्वांच्या पुढे असेल असे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यांनी आपले बहुतेक लेखन देशासाठी तुरुंगात असताना केले.'श्यामची आई' ही आत्मकहाणी त्यांनी तुरुंगात असताना लिहिली. त्याच्या जवळपास तीन लाखाच्यावर प्रती समाजापर्यंत पोहचल्या आहेत.मातेबद्दल असणाऱ्या प्रेम,भक्ती,कृतज्ञता अशा अपार भावना यामध्ये आल्या आहेत. श्यामची आई हे पुस्तक नसून समाजासाठी संस्कार ग्रंथ आहे.समाजासाठी प्रेरणादायी साहित्याची निर्मिती करणारे साने गुरुजी हे भारताला लाभलेले संवेदनशील साहित्यिक होते."
याप्रसंगी इस्लामपूर येथील शुभ्रा प्रकाशनाचे मालक सचिन हांडे यांनी साने गुरुजी यांच्या जीवनावरील व इतर ग्रंथ भेट दिले.यावेळी ग्रंथपाल रुक्साना नदाफ,विवेकानंद मुळे,राजेंद्र इंगळे,सुधीर बनसोडे,सीमा कांबळे,तेजश्री गुरव,शंकर काशीद, रामचंद्र कुलकर्णी,महादेव पवार, डी.जे.माळी व वाचक सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सौ.कांचन धर्मे यांनी मानले.

Comments
Post a Comment