राज्याची शैक्षणिक स्थिती बदलण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक – पवार.
राज्याची शैक्षणिक स्थिती बदलण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक – पवार.
मुंबई: शिक्षण क्षेत्रातील विविध घटक, अभ्यासक यांचे अनुभव ऐकल्यावर, त्यांनी मांडलेले प्रश्न पाहता राज्याची शैक्षणिक स्थिती ही चिंताजनक नाही तर भयावह आहे. ती बदलण्यासाठी सर्व घटकांनी मिळून एक आराखडा तयार करून तो शासनासमोर मांडायला हवा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.
केंद्रीय शिक्षण विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या शैक्षणिक कामगिरी श्रेणी निर्देशांकानुसार (पीजीआय) राज्याची शैक्षणिक कामगिरी खालावल्याचे दिसते आहे. त्याबाबत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाच्यावतीने अभ्यासक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. तेथे पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
शैक्षणिक स्थिती ही संख्यात्मक पातळीवर पाहिली जाते. मात्र शैक्षणिक स्थितीचा लेखाजोखा गुणात्मक पातळीवर मांडणे आवश्यक आहे. शैक्षणिक निर्णय हे कायद्यांना अनुसरूनच घेण्यात यावेत. स्वयंसेवी संस्थांचा अवाजवी हस्तक्षेप टाळावा. पूर्णवेळ शिक्षकांची तातडीने भरती व्हावी, असे मुद्दे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावेळी मांडले. बदल घडवून आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रेरक म्हणून काम करेल, असे सुळे म्हणाल्या. शिक्षण तज्ज्ञ वसंत काळपांडे, किशोर दरक, गिरीश सामंत, फरिदा लांबे, हेमांगी जोशी, रयत शिक्षण संस्थेचे चंद्रकांत दळवी, शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांचे प्रतिनिधी आदी या बैठकीत सहभागी झाले होते

Comments
Post a Comment