दीक्षाभूमी कोकरूड येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न.
दीक्षाभूमी कोकरूड येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
दीक्षाभूमी कोकरूड येथे 27 फेब्रुवारी रोजी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली. या धम्म परिषदेस संपूर्ण शिराळा तालुका आणि सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध बहुजन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले सभागृहामध्ये बुद्धांच भव्यदिव्य पुतळा लावण्यात आला होता तर सभागृहाच्या समोर महामानवाच्या भव्य दिव्य अशा प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या त्या लक्ष वेधत होत्या.*
या धम्म परिषदेस उद्घाटक म्हणून डॉ. प्रतापराव मधाळे हे उपस्थित होते. त्यांनी शिराळा तालुक्यामध्ये पि.टी. मधाळे साहेब आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी व या तालुक्यातील धम्म कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये 1958 मध्ये झालेल्या धम्मदीक्षा कार्यक्रमाचा इतिहास आपल्या भाषणातून मांडला.
धम्म परिषदेचे प्रस्ताविक राहुल कांबळे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी बौद्ध समन्वय समितीची भूमिका समजून सांगितली. बौद्ध समन्वय समितीच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या सर्व संघटनांना एका विचार मंचावर आणण्याचं काम आम्ही करत आहोत. समन्वया शिवाय धम्म चळवळ गतिमान होणार नाही. असे विचार त्यांनी मांडले.
प्रमुख अतिथी म्हणून भदंत एस संबोधी, भदंत आर आनंद, भदंत राहुल,अलकाताई आढाव, डॉ. रा.ज. शित्तुरकर,निवृत्ती झाडे, विलास वाघमारे हे होते.
या वेळी भदंत एस संबोधी यांनी उपासकांनी भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये धम्म चळवळ गतिमान केली पाहिजे; असे विचार मांडले.
डॉ. रा.ज. शित्तुरकर यांनी आता धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी विहारात धम्म वर्ग सुरू केले पाहिजेत असे विचार मांडले.
प्रथम सत्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ बौद्धाचार्य एम. एच. परुले यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिबिरांची माहिती दिली.
डॉ. विद्या नागावकर यांनी वैद्यकीय शास्त्रावर बौद्ध धम्माचा प्रभावच नाही तर ते बौद्ध धम्मातूनच आले आहे असे विचार मांडले. यावेळी त्रिरत्न बौद्ध महासंघचे धम्मचारी बोधीसेन यांनी मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रामध्ये डॉ. संजय पाटील बौद्ध धम्म अभ्यासक यांनी वैद्यकशास्त्रावर बौद्ध धम्माचा प्रभाव कसा आहे याचे विस्तृत असे मार्गदर्शन केले. तर सुकुमार कांबळे यांनी बहुजनांनी आता जनगणनेमध्ये आपला धर्म बौद्ध असा लिहावा असे विचार मांडले.
या धम्म परिषदेची अध्यक्षता प्रा. विलास खरात राष्ट्रीय प्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जनगणनेमध्ये आपण आपला धर्म बौद्ध लिहिला पाहिजे परंतु बौद्ध नेते दिशाहीन करण्याचे काम करत आहेत. या परिसरामधील बौद्ध लेण्यांची विरासत वाचवण्यासाठी काम केले पाहिजे.*
*या धम्मपरिषद 1958 मध्ये शिराळा तालुक्यात बौद्ध धम्मदीक्षेचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेतृत्व करणाऱ्या धम्म बांधवांचा सत्कार करण्यात आला.
या धम्म परिषदेत पुढील प्रमाणे ठराव पास करण्यात आले.
१) बौद्धांचा विवाह कायदा बनला पाहिजे यासाठी संघर्ष करणे.
२) बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी आणि विरासत वाचवण्यासाठी प्रयत्न करणे.
३) बौद्धांनी प्रत्येक रविवारी बुद्ध विहारांमध्ये गेले पाहिजे यासाठी दर रविवारी विहारे खुली ठेवावीत.
४) बहुजन समाजातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या बांधवांना विवाह आणि इतर विधी कार्य यामध्ये अडथळे येणार नाहीत; या साठी प्रयत्न करणे.
५) बौद्ध धम्म स्वीकारलेल्या बांधवांनी जनगणनेमध्ये धर्म बौद्ध असे नमूद करावे जात लिहू नये.
६) प्रत्येक विहारांमध्ये वाचनालय सुरु करावे.
७) विहार ही परिवर्तनाची केंद्र झाली पाहिजेत.
८) शिराळा तालुक्यामध्ये पूर्वी धम्मदीक्षेचे कार्यक्रम झाले होते त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक विहारे झाली पाहिजेत.
९) समाज मंदिर, तक्क्या ऐवजी विहाराचे महत्त्व समजून सांगणे.
१०) गाव तिथे विहार समाज मंदिर नव्हे.
या धम्म परिषदेचे सूत्रसंचालन रणधीर कांबळे यांनी केले. तर आभार वैभव वाघमारे यांनी मानले.
धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी भारत मोहिते, सुनील घोलप, सुनील बाळकृष्ण कांबळे, सुनील वाघमारे, निवृत्ती झाडे, अजय यटम, नामदेव झीमुर, सुनील झीमुर, संजय आढाव, शाहीर शांताराम कांबळे, शरद कांबळे, पंकज वाघमारे, अजय वाघमारे, बाबासो कांबळे, संतोष वाघमारे, डी. एस कांबळे, गौतम मोहीते, संपत गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले.
खूप छान संकल्प आहे.
ReplyDelete🙏
Delete